कबड्डीच्या प्रसारासाठी भारत सरकार काय करतेय? – शशी थरूर

What is the Government of India doing to promote Kabaddi questions Shashi Tharoor

कबड्डीच्या प्रसारासाठी भारत सरकार आणि क्रीडा मंत्रालयाला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार शशी थरूर यांनी काही सवाल केले आहेत. थरूर यांच्या मते कबड्डी ही भारताने जगाला दिलेली देणगी असून इतर देश या खेळाचा स्वीकार करतील यासाठी भारताने प्रयत्न केले पाहिजेत. दुर्दैवाने याकडे दुर्लक्ष होत आहे. कबड्डीच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रसारासाठी भारताने पावले टाकली पाहिजेत. सरकार याबाबत अजून चांगली कामगिरी करेल अशी आशा आहे, असे मत थरूर यांनी व्यक्त केले.

थरूर यांनी क्रीडा मंत्रालयाला कबड्डीच्या प्रसाराबाबत आणि कबड्डीच्या ऑलिंपिक समावेशाबाबत काही प्रश्न विचारले होते. क्रीडा मंत्रालयाकडून मिळालेले उत्तर त्यांनी आपल्या ट्विटर हँडलवर प्रसिद्ध केले आहे.

क्रीडा मंत्रालयाने थरुर यांना उत्तर देताना म्हटले आहे की त्यांनी ऑलिंपिकमध्ये कबड्डीच्या समावेशासाठी त्यांनी आशियाई देशांशी चर्चा केली नाही; पण कबड्डीला देशामध्ये प्रोत्साहन देत असल्याचे सांगितले आहे. तसेच कबड्डीसह क्रीडा क्षेत्रातील लोकांसाठी एसएआय (SAI) आणि लक्ष्मीबाई नॅशनल इंस्टिट्यूट ही केंद्रे विनामूल्य उपलब्ध केली आहेत.

खेलो इंडिया गेम्समध्येही कबड्डीचा समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर १२६ कबड्डीपटूंची खेळो इंडियाच्या टॅलेंट सर्च अँड डेव्हलपमेंट व्हर्टिकल अंतर्गत ‘लाँगटर्म ऍथलिट डेव्हलपमेंट प्रोग्रामसाठी’ निवड झाली आहे.

याबरोबरच क्रीडा मंत्रायलाने थरुर यांच्या प्रश्नांना उत्तर देताना असेही म्हटले आहे की ते ऍमॅच्यूअर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडियाला देश आणि विदेशात प्रशिक्षण आणि स्पर्धात्मक खेळासाठी मदत करत आहेत.

तसेच ऑलिंपिक समावेशाबाबतच्या प्रश्नाला उत्तर देताना क्रीडा मंत्रालयाने म्हटले आहे की ‘कोणत्याही खेळाचा ऑलिंपिकमध्ये समावेश करण्याचा निर्णय आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती (आयओसी) घेते. त्याचबरोबर ऑलिंपिक समावेशासाठी असलेले सर्व निकष आंतरराष्ट्रीय फेडरेशनने पूर्ण केलेले असायला हवेत.

याबरोबरच क्रीडा मंत्रालयाने असेही म्हटले आहे की आंतरराष्ट्रीय स्तरावर कबड्डीचा प्रसार करणे ही आंतरराष्ट्रीय कबड्डी फेडरेशनचे काम आहे; पण त्याला सरकारकडून पूर्ण पाठिंबा असून भारतात किंवा भारताबाहेर कबड्डीच्या स्पर्धा घेण्यास पूर्ण समर्थन आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून भारतात प्रो कबड्डी लीग होत आहे. त्यामुळे सध्या कबड्डी हा खेळ भारतात लोकप्रिय होऊ लागला आहे.