माजी खेळाडू आणि आता प्रशिक्षक.. तेव्हाही हिट, आत्ताही हिट!

Then and now... Super-hit player, Super-hit coach. An attempt to shed light on some of the coaches who have been successful on the field as a player and have now led the team to victory in PKL.

कुठलाही संघ यशस्वी व्हायचा म्हटलं तर फक्त चांगले खेळाडू असून उपयोग नसतो.त्या खेळाडूंच्या क्षमतेचा योग्य वापर करून घेत संघाला विजयपथावर नेण्यासाठी एका चांगल्या प्रशिक्षकाचीसुद्धा गरज असते. संघाने विजय मिळवला की खेळाडूंच्या बरोबरच त्या संघाच्या प्रशिक्षकाचेही कौतुक होत असते.
मैदानावर खेळाडू म्हणून चांगली कामगिरी केलेले अनेकजण पुढे जाऊन प्रशिक्षक पदाची वाट चोखाळतात. प्रोकबड्डी सुरु झाली आणि अनेक खेळाडूंबरोबरच प्रशिक्षकांनाही संधीचे दार उघडले. भारतासाठी खेळलेले असे अनेक खेळाडू सध्या प्रो कब्बडीमध्ये प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत
खेळाडू म्हणून मैदानावर यशस्वी होत आता प्रोकबड्डीत संघाला विजयपथावर नेलेल्या काही प्रशिक्षकांवर या लेखातून प्रकाश टाकण्याचा हा प्रयत्न
१. राम मेहेर सिंग (पटना पायरेट्स) – खेळाडू म्हणून नव्वदच्या दशकात राम मेहर सिंग यांनी भारतासाठी चांगली कामगिरी केली. भारताकडून खेळताना त्यांनी १९९८ च्या आशियाई स्पर्धांमध्ये सुवर्णपदक कमावले. चार वर्षांनी २००२ मध्ये भारतीय संघाचे कर्णधार म्हणून त्यांनी संघाला आशियाई स्पर्धांमध्ये अजून एक सुवर्णपदक मिळवून दिले. कबड्डी क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी भारत शासनाने त्यांना २००२ चा अर्जुन पुरस्कार देऊन गौरवले. हरयाणा शासनानेदेखील भीम पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केले.
राम मेहर सिंग यांनी २००४ साली आपल्या प्रशिक्षक कारकिर्दीला सुरुवात केली. एअरफोर्स आणि सर्व्हिसेस संघाला प्रशिक्षण करताना त्यांनी सलग तीन वर्षे राष्ट्रीय विजेतेपद पटकावले. भारतीय संघाचे राष्टीय निवड समिती सदस्य म्हणूनही त्यांनी पाच वर्षे काम पाहिले आहे.
प्रो कबड्डी लीगमध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली पटना पायरेट्सने पाचव्या हंगामाचे विजेतेपद मिळवले. राम मेहर सिंग प्रशिक्षकपदाची धुरा हाती घेण्याअगोदर पटना संघाने सलग दोन विजेतीपदे मिळवली होती. त्यामुळे साहजिकच सिंग यांच्याकडून संघ व्यवस्थापनाच्या मोठ्या अपेक्षा होत्या. सिंग यांनी एक प्रशिक्षक म्हणून यथायोग्य कामगिरी करत संघाला सलग तिसरे विजेतेपद मिळवून दिले.
२. बलवान सिंग (जयपूर पिंक पँथर्स) – बलवान सिंग ह्यांनी खेळाडू म्हणून आशियाई स्पर्धा आणि दक्षिण आशियाई स्पर्धांचे सुवर्णपदक जिंकलेले आहे. खेळाडू म्हणून १९८१ ते १९९३ या बारा वर्षांमध्ये त्यांनी एकूण नऊ सुवर्णपदके कमावली. पुढे जाऊन प्रशिक्षक म्हणून त्यांनी भारताला तीन विश्वचषक आणि तीन आशियाई सुवर्णपदके मिळवून दिली. कबड्डी क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी २००५ मध्ये भारत शासनाने द्रोणाचार्य पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला. प्रो कबड्डी लीगच्या पहिल्याच हंगामात बलवान सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली जयपूर पिंक पँथर्स संघाने विजेतेपद मिळवले.
३. बी सी रमेश (बंगाल वॉरियर्स) – खेळाडू म्हणून बी सी रमेश यांनी भारताकडून १९९८ आणि २००२ च्या आशियाई स्पर्धांमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. त्यांना भारत शासनाकडून १९९९ मध्ये एकलव्य पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. याबरोबरच २००४ मध्ये झालेल्या कबड्डी विश्वचषक विजेत्या संघांचेही ते सदस्य होते. त्यांनी २००४ ते २००६ अशी तीन वर्षे भारतीय कबड्डी संघाचे नेतृत्वदेखील केले. भारत शासनाने २००१ मध्ये अर्जुन पुरस्कार देऊन त्यांना गौरवले.  त्यांनी २०१६च्या विश्वचषकात अर्जेंटिना संघाचे प्रशिक्षक म्हणूनही काम पाहिले.
प्रो कबड्डी लीगमध्ये रमेश यांनी पुणेरी पलटण आणि बेंगळुरू बुल्स या संघांचे प्रशिक्षक म्हणून काम केले. त्याआधी २०१५ मध्ये त्यांनी बंगाल वॉरियर्सचे सहाय्य्क प्रशिक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली होती. प्रो कबड्डीच्या सातव्या हंगामात त्यांनी बंगाल वॉरियर्सचे मुख्य प्रशिक्षक म्हणून सूत्रे हातात घेतली. यावेळी त्यांनी सुरजित सिंग, रण सिंग सारख्या मोठ्या खेळाडूंना कायम न करण्याचा धाडसी निर्णय घेत सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला. त्याऐवजी त्यांनी के प्रपंजन, रिंकू नरवाल आणि मोहंमद नबीबक्षसारख्या खेळाडूंना संघात सामील करून घेत संघाला पहिले विजेतेपद मिळवून दिले.
४. रणधीर सिंग (बंगळुरू बुल्स) – बीजिंग येथे १९९० मध्ये पार पडलेल्या आशियाई स्पर्धांमध्ये कबड्डीचा समावेश होता. या स्पर्धेत कबड्डीचे सुवर्णपदक जिंकणाऱ्या संघाचे रणधीर सिंग सदस्य होते. एक खेळाडू म्हणून २० आणि प्रशिक्षक म्हणून २० अशी एकूण ४० पदके आपण जिंकली आहेत असे सिंग सांगतात.
प्रोकबड्डीमध्ये बंगळुरू बुल्स हा एकमेव संघ आहे की ज्याने पहिल्या हंगामापासून ते सातव्या हंगामापर्यंत एकच प्रशिक्षक कायम ठेवला. तो प्रशिक्षक म्हणजे रणधीर सिग. सिंग यांनी एक खेळाडू म्हणून भारताकडून चांगली कामगिरी केली. भारत सरकारने त्यांना १९९७ मध्ये अर्जुन पुरस्कार देऊन गौरविले. तसेच २०१२ मध्ये द्रोणाचार्य पुरस्कारासाठीदेखील त्यांचे नामांकन झाले होते.
५. संजीव बालियान (पटना पायरेट्स) – कबड्डीचा पहिला विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा कर्णधार म्हणून संजीव कुमार बालियान यांची ओळख आहे. खेळाडू म्हणून त्यांनी १९९४ च्या ४२ व्या वरिष्ठ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत भारतीय पोलीस संघाकडून सुरुवात केली. लवकरच ते रेल्वेकडून खेळू लागले. रेल्वेकडून खेळताना त्यांनी आपल्या संघाला १९९८ आणि २००१ मध्ये सुवर्णपदक जिंकून दिले. भारताकडून ते १९९८ च्या बँकॉक आशियाई स्पर्धा तसेच १९९९ च्या दक्षिण आशियाई स्पर्धांमध्ये खेळले. मुंबईत २००४ साली पहिल्यावहिल्या कबड्डी विश्वचषकात त्यांनी भारताच्या नेतृत्वाची धुरा यशस्वीपणे सांभाळली. इराणविरुद्धच्या अंतिम सामन्यात १६ रेडमध्ये १७ गुण नोंदवत त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. कबड्डी क्षेत्रातील भरीव कामगिरीसाठी भारत सरकारने त्यांना २००३ मध्ये अर्जुन पुरस्कार देऊन गौरवले. रेल्वेकडून खेळाडू म्हणून त्यांनी तब्बल पाच वेळा सर्वोत्कृष्ट खेळाडूचा किताब जिंकला.
निवृत्तीनंतर त्यांनी रेल्वेचे प्रशिक्षक म्हणूनही काम केले. गेल्या वर्षी पार पडलेल्या ६६ व्या  आणि यावर्षीच्या ६७ व्या वरिष्ठ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धांमध्ये रेल्वेच्या संघाने त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुवर्णपदक जिंकले. प्रोकबड्डीच्या तिसऱ्या हंगामात प्रशिक्षक म्हणून त्यांनी पटना पायरेट्स संघाला विजेतेपद मिळवून दिले. गेल्यावर्षी यु मुंबाने त्यांची प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली.