विश्वचषक जिंकला म्हणून भारतीय संघाला मिळाले फक्त ७१,४२८ रुपये!
The Indian Team Got Only Rs 71,428 For Winning The World Cup!

२०१६ च्या कबड्डी विश्वचषकाच्या अंतिम फेरीचा सामना. मध्यंतराला भारत इराणविरुद्ध चक्क पिछाडीवर पडलाय. सामन्याच्या उत्तरार्धात मनजीत चिल्लर बाद होऊन इराणची आघाडी १९-१३ एवढी वाढलीये. कबड्डीत कायम विजयी होण्याची भारताची परंपरा खंडित होते की काय अशी भीत वाटत असतानाच अजय ठाकूरने एका रेडमध्ये फझल आणि मेराज शेखला बाद केले. ह्या रेडने भारतीय संघाचा आत्मविश्वास परतला. एकेक करत इराणचे सारे गडी बाद करत भारताने सामन्याच्या ३० व्या मिनिटाला इराणच्या संघाला ऑल आऊट करत २४-२१ अशी आघाडी घेतली. सामन्याच्या पूर्वार्धात कमी पडलेल्या बचावफळीने उत्तरार्धात मात्र जोरदार कामगिरी करत भारताच्या विजयाला चार चांद लावले. विश्वचषक जिंकला.
सबंध देशात भारतीय संघाचे कौतुक झाले. मात्र एका गोष्टीने भारताच्या विजयाच्या आनंदाला मर्यादा आली. कबड्डीचा विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाला फक्त १० लाख रुपयांचे बक्षीस देण्यात आले. या स्पर्धेत भारताने १४ खेळाडूंचा संघ पाठवला होता. संघाचे प्रशिक्षक आणि इतर कर्मचारी यांना सोडले तर प्रत्येक खेळाडूला फक्त ७१४२८ रुपये मिळाले होते.विश्वचषक जिंकणाऱ्या खेळाडूंना एवढीशी रक्कम बक्षीस म्हणजे हद्दच झाली.
Related Posts
भारतीय चाहत्यांना याबाबत माहिती समजल्यावर त्यांनी सोशल मीडियावर आपली नाराजी प्रकट केली. भारताचा स्टार खेळाडू अजय ठाकूर यानेदेखील बक्षिसाच्या रकमेबद्दल नाराजी व्यक्त केली. कबड्डीचा विश्वचषक जिंकूनही केंद्र सरकार किंवा राज्य सरकारांनी खेळाडूंना कुठलाही आर्थिक पुरस्कार न देणे हे आश्चर्यकारक आहे असे अजय म्हणाला होता. एकीकडे ऑलिम्पिक पदक विजेत्यांना आर्थिक पुरस्कार मिळत असताना कबड्डी विश्वचषक विजेत्यांना सगळ्यांना मिळून १० लाख रुपये देणे हे खेळाडूंचा आत्मविश्वास कमी करणारे आहे.
कबड्डी संघाला देण्यात आलेल्या बक्षिसाच्या रकमेबद्दल सोशल मीडियातून बरीच टीका झाली. यानंतर तत्कालीन क्रीडा मंत्री विजय गोयल यांनी संपूर्ण भारतीय कबड्डी संघाला आपल्या निवासस्थानी पाचारण करून त्यांचा सन्मान केला होता. याच कार्यक्रमात त्यांनी प्रत्येक खेळाडूला १० लाख रुपये देण्यात येतील तसेच प्रशिक्षक इतर कर्मचारी यांनाही आर्थिक स्वरूपात बक्षीस देण्यात येईल अशी घोषणा केली होती.