भारताला आशियाई स्पर्धांचे सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या प्रशिक्षकाला तमिळ थलाईवाजने केले पुन्हा करारबद्ध

आगामी प्रो कबड्डी लीगच्या (पीकेएल) ८ व्या हंगामाला लवकरच सुरुवात होणार आहे. त्यामुळे आता सर्वच संघ उत्सुक असून या हंगामाच्या दृष्टीने तयारीही सुरु झाली आहे. तमिळ थलाईवाज या संघाने जे उदय कुमार यांना मुख्य प्रशिक्षक म्हणून पुन्हा करारबद्ध केले आहे. २०१९ साली तमिळ थलाईवाजच्या खराब प्रदर्शनामुळे प्रशिक्षक पदावरून पायउतार झालेल्या एदाचेरी भास्करण यांच्या जागी पीकेएलच्या अर्ध्या हंगामानंतर उदय कुमार यांना तमिळ थलाईवाजने मुख्य प्रशिक्षक म्हणून निवडले होते.

तमिळ थलाईवाजने ३१ ऑगस्टपासून मुंबई येथे होणाऱ्या लिलावापूर्वी ही घोषणा केली. याच्या आधी जे उदय कुमार यांनी तेलगू टायटन्स आणि युपी योद्धा या संघाचे प्रशिक्षक म्हणून देखील काम पाहिले होते.

पीकेएलच्या ७ व्या हंगामात जे उदय कुमार यांच्या प्रशिक्षकपदात तमिळ थलाईवाजने त्यांच्या २२ सामन्यात केवळ ४ सामने जिंकले होते. मात्र तरीही संघ व्यवस्थापकांनी त्यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना पुन्हा करारबद्ध केले. मूळचे केरळचे असलेल्या जे उदय कुमार यांनी गेल्या हंगामात अजित कुमार, अभिषेक आणि सागर राठी यांसारख्या नवोदित खेळाडूंना पीकेएलच्या ७ व्या हंगामात पाठिंबा दिला होता.

कोण आहेत तमिळ थलाईवाजचे मुख्य प्रशिक्षक जे उदय कुमार?
जे उदय कुमार हे भारतातील कबड्डीचे उत्कृष्ट प्रशिक्षकांपैकी एक आहेत. ते भारतीय संघाच्या राष्ट्रीय कबड्डी संघाचे प्रशिक्षक असताना भारतीय संघाने आशियाई स्पर्धेत ३ वेळा सुवर्ण पदक मिळवले आहे.

जे उदय कुमार यांनी राष्ट्रीय खेळाडू म्हणून केरळ, दिल्ली आणि राजस्थान संघाचे प्रतिनिधित्व केले होते. उदय कुमार यांनी त्यांच्या प्रशिक्षक कारकिर्दीत कबड्डीचा मातीतून मॅटवर जाण्याचा संपूर्ण प्रवास पाहिला आहे. त्याच सोबत उदय कुमार यांनी याच्या आधी पीकेएलमध्ये तेलगू टायटन्स आणि युपी योद्धा संघाचे प्रशिक्षकपद सांभाळले होते. आता ते यंदाच्या हंगामात तमिळ थलाईवाज संघाचे प्रशिक्षक असणार आहेत.

गेल्या ३ हंगामात तमिळ थलाईवाजची कामगिरी अत्यंत खराब राहिली होती. गेले ३ वर्ष ते गुणतालिकेत शेवटच्या फळीत राहिले होते. अशात तमिळ थलाईवाज त्यांच्या संघात काही बदल करून पुन्हा नव्याने पीकेएलच्या या हंगामात चांगली खेळी करून दाखवण्यासाठी जोरदार तयारी करत आहे. त्यांनी यंदाच्या हंगामात सर्वात कमी ३ खेळाडूंना संघात पुन्हा सामील (रिटेन) केले आहे. ज्यामध्ये सागर राठी, हिमांशू आणि एम अभिषेक या खेळाडूंचा समावेश आहे.