शिवनेरी मंडळाची कबड्डी स्पर्धा रद्द, पण खेळाडूंच्या मुलाखतीने आठवणींना उजाळा देणार
Shivneri Mandal's Kabaddi Tournament called off, player's interview will help to relive memories

मुंबई: शिवनेरी सेवा मंडळाच्या वतीने गेली ५०वर्ष सातत्याने होणारी कबड्डी स्पर्धा यावर्षी कोरोना विषाणू संसर्गजन्य विकाराच्या महाभयंकर विकारामुळे रद्द करण्यात आली आहे. प्रथम विकास मंडळाच्या वतीने “भगवान पालव” चषकाकरिता ही स्पर्धा भरविन्यात येत असे. कालांतराने ती बंद पडली. त्यानंतर १९६९ साली शिवसेनाप्रमुख मा.स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या पुढाकाराने व त्यावेळचे नगरसेवक मोहन नाईक यांनी ही स्पर्धा शिवनेरी सेवा मंडळाच्या विद्यमाने उदयदादा लाड यांच्या सहकार्याने “राजाराम लाड” चषकासाठी सुरू केली, ती आजतागायत सुरू होती.
मुंबईतील कबड्डी हंगामाची सुरुवात या स्पर्धेपासूनच सुरू होतो अशी या स्पर्धेची ओळख आहे. गेली कित्येक वर्षे ही परंपरा कायम होती ती कोरोनामुळे या वर्षी खंडित झाली.
कोरोनामुळे जरी यंदा ही स्पर्धा होऊ शकत नाही तरी ती उणीव एका वेगळ्या पद्धतीने भरून काढण्याचा मानस या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. यानिमित्ताने १७ ते २५ ऑक्टोबर या कालावधीत अर्जुन व शिवछत्रपती पुरस्कार यांच्या ऑन-लाईन मुलाखती घेण्यात येतील.
त्या फेसबुक व यु-ट्युबच्या माध्यमातून कबड्डीप्रेमीपर्यंत पोहचवून या स्पर्धेतील जुन्या आठवणीना उजाळा देण्याचा यानिमित्ताने प्रयत्न करण्यात येईल. त्याच बरोबर नवरात्र उत्सव मंडळाच्यावतीने शासन नियमाचे काटेकोरपणे पालन करून कोरोना विरोधात विभागात जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच “रक्तदान शिबीर” मोठ्या प्रमाणात आयोजित करून यातून सामाजिक बांधिलकी देखील जपली जाणार आहे. अशी माहिती या पत्रकाद्वारे प्रकाश भोसले (९६६४८७५०५१) व किरण मोरजकर यांनी संयुक्तरित्या प्रसार माध्यमाकरिता दिली आहे.