कबड्डीला ऑलिंपिकमध्ये नेणे हे आमचे अंतिम ध्येय – किरेन रिजीजु

Our Ultimate Goal Is To Take Kabaddi To The Olympics – Kiren Rijiju

कबड्डीचा ऑलिंपिकमध्ये समावेश करणे हे भारताचे अंतिम ध्येय आहे असे प्रतिपादन केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजीजु यांनी सोमवारी केले. “कबड्डीचे वलय हे केवळ भारत किंवा आशिया खंडापुरते मर्यादित नसून सबंध जगात आहे.” असे ते म्हणाले.

स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया तर्फे आयोजित क्रीडा क्षेत्राशी संबंधित वेबिनारमध्ये ते बोलत होते. या वेबिनारमध्ये भारत, कोरिया, मलेशिया आणि इतर देशांच्या एकूण ७०० हुन अधिक कबड्डी प्रशिक्षकांनी सहभाग घेतला होता.

“कबड्डीचा याआधीच आशियाई स्पर्धांमध्ये समावेश केला आहे. आता भारत आणि इतर आशियाई देशांनी एकत्र येऊन कबड्डीला ऑलिंपिकमध्ये नेण्यासाठी एकत्रितपणे प्रयत्न करणे गरजेचे आहे. हे आपले अंतिम ध्येय आहे.

हे ध्येय साध्य करण्यासाठी भारतातील कबड्डीच्या स्तरामध्ये सुधारणा करणे गरजेचे आहे. तसेच भारत आणि जगातील इतर देशांमध्ये कबड्डीचा जास्तीत जास्त प्रचार आणि प्रसार कसा होईल याकडे लक्ष दिले पाहिजे.”

वेबिनारचे महत्व सांगताना रिजीजु म्हणाले, “आपण करोनावर विजय मिळवून लवकरच मैदानात परतू याचा मला विश्वास आहे.मात्र सध्याच्या परिस्थितीत वेबिनारसारखी तंत्रे परिणामकारकपणे वापरण्यावर भर दिला पाहिजे.स्वतःला देशाबरोबर आणि जगाबरोबर जोडण्यासाठी हे महत्वाचे आहे.”