अनुपसाठी नाणेफेकीचे असेही महत्व 

For Anup Kumar, coin toss is more than just a process

कबड्डीच्या सामन्याची सुरुवात नाणेफेकीने होते. मात्र ही नाणेफेक केवळ सामना सुरु करण्यासाठीची प्रक्रिया नसून त्याहूनही अधिक काहीतरी आहे असे मत भारताचा माजी कर्णधार अनुप कुमारने मांडले. अनुप प्रो कबड्डी लीगच्या इंस्टाग्राम हँडलवरून आयोजित ‘बियॉंड द मॅट’ या लाईव्ह सेशनमध्ये बोलत होता.
यावेळी अनुप म्हणाला,
“नाणेफेक ही केवळ सामना सुरु करण्यासाठीची प्रक्रिया नाही. हे त्याहून अधिक काहीतरी आहे. सुरुवातीला तुम्ही जर मैदानाची बाजू निवडली तर सामन्याच्या उत्तरार्धारात तुम्हाला चढाई करण्याची संधी मिळते. यावेळी  जर प्रतिस्पर्धी संघात कमी खेळाडू असतील तर तुम्हाला ऑल आऊट करण्याची चांगली संधी असते. तुमच्या संघात कमी खेळाडू बाकी असतील तर ह्या चढाईत तुम्ही एकापेक्षा अधिक गुण नोंदवून आपल्या संघातील खेळाडू पुन्हा मैदानात आणू शकता.यामुळे कदाचित सामन्याचे पारडे तुमच्या बाजूने पलटू शकते.”
अनुप प्रो कबड्डीच्या पहिल्या हंगामापासून सहाव्या हंगामापर्यंत खेळाडू म्हणून खेळला. खेळाडू म्हणून मॅटवर असताना आपल्या डावपेचांनी तो अनेकदा प्रतिस्पर्धी संघाला आश्चर्यचकित करत असे. नाणेफेकीचे असेही महत्व सांगून अनुपने कबड्डी खेळाडूंना, चाहत्यांना पुन्हा एकदा आपल्या चलाख विचारसरणीची चुणूक दाखवून दिली.