पाच असे प्रसंग जेव्हा भारत कबड्डीत पराभूत झाला होता 

Five occasions when India lost in Kabaddi

कबड्डीमध्ये भारताचे वर्चस्व सर्वश्रुत आहे. आजवर झालेले सर्व विश्वचषक भारताने जिंकले आहेत. कुठलीही मोठी स्पर्धा असली की भारतीय संघाचा विजय जवळपास निश्चित असतो. म्हणूनच भारताला कबड्डीची महासत्ता म्हणून संबोधले जाते. मात्र या महासत्तेलासुद्धा काहीवेळा पराभवाची चव चाखावी लागली आहे. या लेखातून आपण भारताच्या अशाच पाच पराभवांचा आढावा घेणार आहोत.
१. भारत वि पाकिस्तान (१९९३ दक्षिण आशियाई स्पर्धा, ढाका)
भारताला कबड्डीत पहिल्यांदा पराभवाची चव आपला पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानकडून चाखावी लागली होती. बांगलादेश येथे १९९३ मध्ये पार पडलेल्या दक्षिण आशियाई स्पर्धांच्या अंतिम फेरीत पाकिस्तानने भारताला पराभूत केले होते. नव्वदच्या दशकात भारतआणि पाकिस्तान या दोन देशांचे कबड्डीमध्ये प्रस्थ होते. त्यावेळच्या भारतीय संघात तीर्थराज, आशण कुमार, काशिनाथ भास्करन असे खेळाडू होते. दक्षिण आशियाई स्पर्धेतील हा एक पराभव सोडला तर भारत पुन्हा कधीही या स्पर्धेत पराभूत झालेला नाही. दक्षिण आशियाई स्पर्धांच्या इतिहासात कबड्डीत भारत सर्वाधिक यशस्वी संघ आहे. भारताने तब्बल नऊ वेळा या स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले आहे.
२. भारत वि दक्षिण कोरिया (२०१६ कबड्डी विश्वचषक, अहमदाबाद)
प्रत्येक विश्वचषकात संभाव्य विजेते म्हणून खेळणाऱ्या भारतीय संघाला २०१६ च्या विश्वचषकात मात्र दक्षिण कोरियासारख्या तुलनेने कमकुवत संघाकडून पराभूत व्हावे लागले होते. या विश्वचषकातील पहिल्याच सामन्यात कोरियाने भारताला पाणी पाजत आपली विश्वचषक मोहीम जोमात सुरु केली होती. सामन्याच्या मध्यंतराला भारताकडे १८-१३ अशी पाच गुणांची आघाडी होती. मात्र दुसऱ्या सत्रात कोरियाने जोरदार मुसंडी मारली. जांग कून ली च्या जोरदार चढायांच्या जोरावर कोरियाने भारताला ३४-३२ असे पराभूत केले. भारतासाठी हा पराभव म्हणजे एक इशारा होता. भारतीय संघानेही या पराभवातून धडा घेत स्पर्धेतील पुढचे सारे सामने जिंकत विश्वचषकावर नाव कोरले.
३. भारत वि दक्षिण कोरिया (२०१८, आशियाई स्पर्धा, जकार्ता)
दोन वर्षांपूर्वी विश्वचषकात भारताला पराभूत केलेल्या दक्षिण कोरिया संघाने पुन्हा २०१८ मध्ये आशियाई स्पर्धांमध्ये भारताला पाणी पाजले. आशियाई स्पर्धांमधील भारताचा हा पहिलाच पराभव होता. भारताचे आघाडीचे खेळाडू अजय ठाकूर आणि परदीप नरवाल याना कोरियन बचावाने जखडून ठेवले होते. अशातच जांग कून ली आणि डाँग जीऑन ली या दोघांनी भारतीय बचावला खिंडार पाडले. कोरियाने या सामन्यात २४-२३ असा विजय मिळवला. कोरियाविरुद्ध पराभूत झाल्याने भारताला या गटातदुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. याचा परिणाम म्हणून भारताला उपांत्य फेरीत इराणचा सामना करावा लागला. याही सामन्यात भारत पराभूत झाला.
४. भारत वि इराण ( २०१८, आशियाई स्पर्धा, जकार्ता)
आशियाई स्पर्धांमधील भारताचा सर्वाधिक लाजिरवाणा पराभव म्हणून या सामन्याचे वर्णन करता येईल. प्राथमिक फेरीत दक्षिण कोरियाकडून हरल्यामुळे उपांत्य फेरीत भारताची गाठ इराणशी पडली. इराणने भारताचा पराभव करत भारताला कांस्य पदकावर समाधान मानण्यास भाग पाडले. फझल अत्राचलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या इराण संघाने सामन्याच्या सुरुवातीपासून आपली पकड ठेवली. भारताचा बचाव आणि आक्रमण दोन्ही इराणच्या तुलनेत फिके पडले. अखेरीस इराणने भारताचा २७-१८ असा पराभव केला. पुढे जाऊन इराणने अंतिम फेरीत दक्षिण कोरियाला पराभूत करत सुवर्णपदक मिळवले. या पराभवानंतर भारतीय संघावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती.
५. भारत ७ वि विश्व ७ (प्रो कबड्डी ऑल स्टार सामना)
प्रो कबड्डी लीगचा सातवा हंगाम सुरु होण्याअगोदर भारत ७ वि विश्व ७ असा प्रदर्शनीय सामना खेळविण्यात आला. प्रदर्शनीय असला तरी या सामन्यात दोन्हीकडचे खेळाडू तडफेने खेळले. पहिल्या सत्राच्या अखेरीस भारताकडे २०-१४ अशी आघाडी होती. भारताकडून पवन सेहरवतने सुपर १० नोंदवत संघाला आघाडीवर नेण्यात महत्वाची भूमिका बजावली. विश्व ७ संघाकडून जांग कून ली आणि मोहंमद नबीबक्ष यांनी जोरदार कामगिरी करत भारत ७ संघाला ३३-३२ असे पराभूत केले. भारताकडून पवनने अखेरची चढाई केली मात्र यात त्याची पकड झाल्याने भारताने सामना गमावला.