‘सुपर टेन’ करूनही त्यांचे संघ हारले प्रो कबड्डीचे अंतिम सामने…

Even Super 10's couldn't help these teams win the Pro Kabaddi League title

-शारंग ढोमसे

‘भारताचा पराभव धोनीची एकाकी झुंज’,’रोहितची शतकी खेळी व्यर्थ,भारत पराभूत’ या आणि अशा मथळ्याच्या अनेक क्रीडा क्षेत्रातील बातम्या आपण अनेक वेळा वाचतो,ऐकतो.
सांघिक खेळांमध्ये वैयक्तिक कामगिरीला महत्व असले तरी संपूर्ण संघ एकजुटीने खेळला नाही तर एकट्या-दुकट्या खेळाडूने केलेल्या चांगल्या कामगिरीच्या जोरावर काही सामने जिंकता येतात मात्र मोठ्या स्पर्धा नाही आणि संघ हारला तर त्या वैयक्तिक कामगिरीला काही महत्व उरत नाही.मात्र तरीसुद्धा त्यापैकी निवडक खेळी आपल्या कायम लक्षात राहतात. प्रो कबड्डीच्या इतिहासातसुद्धा असं अनेक वेळा घडलंय.एखादा चढाईपटू सुपर टेन करतो किंवा एखादा बचावपटू ‘हाय फाईव्ह’ पूर्ण करतो मात्र त्याचा संघ हारतो.विशेष म्हणजे प्रो कबड्डीच्या ७ हंगामांपैकी ५ हंगामांच्या अंतिम सामन्यांत असं घडलंय.कोण आहेत हे खेळाडू ज्यांनी ‘सुपर टेन’ करूनही त्यांचा संघ विजेतेपदापासून दूर राहिला,जाणून घेऊयात-

१. अनुप कुमार(पहिला हंगाम: अंतिम सामना: जयपुर पिंक पँथर्स विरुद्ध यु मुंबा):

प्रो कबड्डी ची सुरुवात ज्या दोन संघांच्या सामन्याने झाली तेच दोन संघ पहिल्या हंगामाचे विजेतेपद मिळविण्यासाठी एकमेकांसमोर उभे ठाकले होते.उभय संघांमध्ये पहिल्या हंगामात झालेल्या दोन सामन्यांपैकी एका सामन्यात अनुप कुमारच्या यु मुंबा ने जयपुर पिंक पँथर्सचा सहज पराभव केला होता तर दुसरा सामना हा बरोबरीत सुटला होता.जयपुर पिंक पँथर्स आणि यु मुंबा हे दोन्ही संघ अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर होते, त्यामुळे हा सामना अटीतटीचा होणार अशी दाट शक्यता होती. मात्र मनिंदर सिंग,राजेश नरवाल, जसविर सिंह यांच्या एकत्रित कामगिरीपुढे यु मुंबाची मात्रा चालली नाही. अनुप कुमार ने एकाकी झुंज देण्याचा प्रयत्न केला.अनुपने या सामन्यात २१ चढायांमध्ये एकूण १० गुण मिळवले मात्र उर्वरित संघाची साथ त्याला मिळू शकली नाही आणि यु मुंबाला या सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. विशेष म्हणजे अनुप कुमारने केलेला सुपर टेन हा या सामन्यातील एकमेव सुपर टेन होता,मात्र तरीदेखील सांघिक कामगिरीच्या जोरावर जयपुर ने यु मुंबा चा ३४- २२ अशा गुण फरकाने पराभव केला.

२. जसवीर सिंग(चौथा हंगाम:अंतिम सामना:पाटणा पायरेट्स:विरुद्ध जयपूर पिंक पँथर्स ):

सुरुवातीला सावकाश चढाई करत अचानक चढाईचा वेग वाढवत समोरच्या संघाला आश्चर्यचकित करण्याच्या खास शैली साठी प्रसिद्ध असणाऱ्या जसवीर सिंगला सुद्धा या हंगामात जयपूरला विजेतेपद मिळवून देण्यात यश आले नाही.पाटणा विरुद्धचा या सामन्यात जसवीरने २१ चढायांमध्ये तब्बल १३ गुण मिळवले,मात्र समोरच्या संघातील अव्वल चढाईपटू परदीप नरवाल यानेही सोळा गुणांची कमाई केली. एकंदरीत फक्त चढाईचे गुण लक्षात घेतल्यास जयपुरने २१ गुण मिळवले होते तर पाटणाने २० मात्र पाटणाचे संरक्षण हे जयपूर पेक्षा कितीतरी उजवे ठरले आणि म्हणूनच जसवीरने सुपर टेन करूनही जयपुर पराभूत झाले!

३. सचिन तंवर(पाचवा हंगाम:अंतिम सामना:गुजरात फॉर्च्यून जायंट्स विरुद्ध पाटणा पायरेट्स ):

प्रशिक्षक मनप्रीत सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या पदार्पणाच्या हंगामातच गुजरात फॉर्च्यून जायंट्सने धडाकेबाज कामगिरी करत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला.विशेष म्हणजे साखळी सामन्यांमध्ये त्यांनी दोन्ही वेळेस पाटणा पायरेट्सचा पराभव केला. त्यामुळे अंतिम सामन्यात सुद्धा ते विजय होतील अशी अपेक्षा होती.परदिप नरवालला थांबवण्यासाठी आमचा बचाव भक्कम असल्याचे मनप्रीत सिंह यांनी आधीच सांगून टाकले होते. मात्र प्रत्यक्षात काही वेगळेच घडले परदीप नरवाल आणि मोनू गोयत यांच्या झंजावातासमोर गुजरातने शरणागती पत्कारली. पाटणाने गुजरातचा ५५-३८ अशा गुण फरकाने दारुण पराभव केला.मात्र सचिन तंवर या उदयोन्मुख खेळाडूने या सामन्यात आपल्या चांगल्या कामगिरीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. सचिनने १५ चढायांमध्ये ११ गुण मिळवत एकाकी झुंज दिली,अर्थातच ती अयशस्वी ठरली!

४.सचिन तंवर(सहावा हंगाम:अंतिम सामना:गुजरात फॉर्च्यून जायंट्स विरुद्ध बेंगळुरू बुल्स ):

पाचव्या हंगामाच्या अंतिम सामन्यातील पराभवाचे शल्य बाजूला ठेवत गुजरातने सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरी गाठली.मागच्या वेळी गेलेली संधी आता जाऊ द्यायची नाही याच इराद्याने गुजरात अंतिम सामन्यात उतरले.सामना शेवटपर्यंत अटीतटीचाच झाला.सचिनने पुन्हा एकदा अतिशय चांगली कामगिरी करत आपला सुपर टेन पूर्ण केला.सामना संपायला केवळ ४ मिनिटे शिल्लक असतांना गुजरातकडे २ गुणांची आघाडी होती.मात्र,शेवटच्या ४ मिनिटांत ‘पवन कुमार’ नावाच्या आलेल्या वादळात गुजरातचे विजेतेपद मिळवण्याचे स्वप्न सुद्धा पुन्हा एकदा लुप्त झाले.केवळ ४ गुणांनी बेंगळुरूने गुजरातवर विजय मिळवला आणि सचिनचा सुपर टेन पुन्हा एकदा वाया गेला!

५.नवीन कुमार(सातवा हंगाम:अंतिम सामना:दबंग दिल्ली के.सी. विरुद्ध बंगाल वॉरियर्स):

या यादीतील कदाचित सर्वाधिक आश्चर्यचकित करणारे हे नाव आहे.आपला केवळ दुसरा हंगाम खेळणाऱ्या नवीनने या हंगामात अक्षरशः सुपर टेनचा रतीब लावला होता.त्याने या हंगामात तब्बल २२ सुपर १० केले.सलग २१ सामन्यांत सुपर टेन करत त्याने एक नवा विक्रम प्रस्थापित केला.या हंगामात तो खेळलेल्या सगळ्या सामन्यांत एक सामना वगळला तर इतर सर्व सामन्यांत त्याने सुपर टेन केले.अंतिम सामना सुद्धा त्याला अपवाद नव्हता.अंतिम सामन्यात त्याने तब्बल १८ गुण मिळवले मात्र ते त्याच्या संघाला विजय मिळवून देण्यात कमी पडले.दिल्लीचे चढाईचे गुण हे बंगालपेक्षा अधिक होते मात्र दिल्लीच्या क्षेत्ररक्षणाने निराशा केली.त्यामुळेच शेवटच्या ४ मिनिटांत नवीनने शर्थीचे प्रयत्न करूनही दिल्लीला पराभवाला सामोरे जावे लागले!