मोठी बातमी – महाराष्ट्रातील कबड्डी खेळाडूंवरील बंदी उठवली
Breaking – Ban on Maharashtra Kabaddi players to be revoked

करोनामुळे सध्या कबड्डीच्या सर्व स्पर्धा स्थगित केल्या आहेत किंवा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. असे असले तरी महाराष्ट्रातील महिला कबड्डी खेळाडूंना आता पुन्हा एकदा मॅटवर येता येणार आहे.महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेने दीपिका जोसेफ हिच्यावर ५ वर्षे तर सायली केरीपाळे आणि स्नेहल शिंदे या दोघींवर प्रत्येकी २ वर्षांची बंदी घातली होती.ही बंदी मागे घेण्याचा निर्णय आता घेण्यात आल्याचे समजते.महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या ऑनलाईन बैठकीत हा निर्णय झाला.
महाराष्ट्र महिला कबड्डी संघाने ६६ व्या वरिष्ठ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत हाराकीरी केली होती. या स्पर्धेत महिला संघ साखळी फेरीतच गारद झाला होता. केरळ सारख्या दुबळ्या संघाविरुद्ध जाणूनबुजून हारल्याचा आरोप संघावर आणि संघाचे प्रशिक्षक राजू भावसार यांच्यावर ठेवण्यात आला होता. या आरोपांच्या चौकशीअंती जोसेफ, केरीपाळे, शिंदे या खेळाडू, भावसार आणि व्यवस्थापिका मनिषा गावंड यांच्यावर महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेने बंदी घातली होती. या बंदीवर कबड्डी क्षेत्रातून रोगापेक्षा इलाज भयंकर म्हणून टीकाही झाली होती.
आता मात्र या सर्व खेळाडूंवरील बंदी मागे घेण्याचा निर्णय झाला असल्याचे समजते.या निर्णयामुळे या तिन्ही खेळाडू पुन्हा एकदा मॅटवर परतून लवकरच महाराष्ट्राकडून कबड्डी स्पर्धांमध्ये खेळताना दिसतील अशी आशा आहे.
का घालण्यात आली होती या खेळाडूंवर बंदी? सविस्तर वाचा या लिंक वर.