कबड्डी खेळाडूंना रेल्वेत नोकरी नक्की मिळते तरी कशी?

How exactly do Kabaddi players get a job in railways?

–  शारंग ढोमसे

राष्ट्रीय स्तरावर कबड्डीचे सगळ्यात मजबूत संघ म्हटले की त्यात रेल्वेचं नाव अगदी वरच्या क्रमांकावर घेतलं जातं.राष्ट्रीय स्पर्धांमध्ये रेल्वेच्या दोन्ही म्हणजे महिला आणि पुरुष संघांचा चांगलाच दबदबा राहिलेला आहे.महिला संघाने तर सलग ३१ वर्ष वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला आहे.त्यामुळेच भारतीय संघातही कायम रेल्वेच्या खेळाडूंचा भरणा असतो.

अगदी अलिकडची उदाहरणं द्यायची तर पवन सेहरावत,रविंदर पहल,विकास कंडोला,सुनील-परवेशची जोडगोळी हे सगळे रेल्वेचेच खेळाडू. रेल्वेचा संघ इतकी सातत्यपूर्ण कामगिरी करतो कारण देशातल्या वेगवेगळ्या राज्यांतील उत्कृष्ट खेळाडूंना रेल्वे स्पोर्ट्स कोट्यातून नोकरीची संधी देते. प्रामुख्याने सामान्य कुटुंबातून येणाऱ्या कबड्डी खेळाडूंना यामूळे आर्थिक स्थैर्य लाभते.शिवाय या खेळाडूंना अनेक सोयी सुविधा रेल्वेतर्फे दिल्या जातात. उदाहरणार्थ एखाद्या खेळाडूने राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले तर त्याला वर्षातून तब्बल ३३० दिवस पगारी रजा मिळते.

यांसारख्या सुविधांमुळे खेळाडू आपल्या खेळाकडे आणि प्रशिक्षणाकडे अधिक योग्य प्रकारे लक्ष देऊ शकतात. साहजिकच सर्वच उत्तम खेळाडूंना रेल्वेत नोकरी मिळावे असे वाटते. या कबड्डी खेळाडूंना रेल्वेत नोकरी नक्की मिळते तरी कशी? ती मिळवण्यासाठी काय प्रक्रिया असते? हे या लेखातून जाणून घेऊयात.

रेल्वेत खेळाडूंना नोकरी देण्यासाठी खास ‘रेल्वे स्पोर्ट्स प्रमोशन बोर्डाची’ स्थापना करण्यात आलेली आहे.स्पोर्ट्स कोट्यातून नोकरी देण्याच्या संपूर्ण प्रक्रियेवर या बोर्डाचे नियंत्रण असते. खेळाडूंना नोकरी मिळवण्याच्या दोन पद्धती आहेत. एक म्हणजे ‘टॅलेंट स्काऊटिंग'(प्रतिभा शोध प्रक्रिया) आणि दुसरी म्हणजे खुल्या जाहिरातीद्वारे निवड.

दरवर्षी स्पोर्ट्स कोट्यातून किती कबड्डी खेळाडू निवडायचे हे ठरलेले असते. त्यातील ६०% खेळाडू हे टॅलेंट स्काऊटिंगद्वारे निवडले जातात तर उर्वरीत ४०% खेळाडू हे खुल्या जाहिरातीद्वारे निवडले जातात. आता या दोन प्रक्रियांबद्दल सविस्तर जाणून घेऊ.

१)टॅलेंट स्काऊटिंग:

– गेल्या दोन वर्षांत राष्ट्रीय स्पर्धेत पदक प्राप्त करणाऱ्या किंवा विविध स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना नेमणुकीसाठी रेल्वेकडून आमंत्रित केले जाते. एखादा खेळाडू स्वतः देखील यासाठी अर्ज करू शकतो अर्थात त्याचा स्वीकार करायचा किंवा नाही हे रेल्वे ठरवते.

– या द्वारे केवळ १८-२५ वयोगटातील खेळाडूंनाच नोकरीची संधी दिली जाते. अर्थात एखाद्या खेळाडूची अतिउत्कृष्ट कामगिरी बघता या वयाच्या मर्यादेत सूट देखील दिली जाऊ शकते.

– खेळाडूने किमान शैक्षणिक अर्हता प्राप्त केलेले असावी. यात देखील अतिउत्कृष्ट कामगिरीसाठी सूट दिली जाऊ शकते. मात्र नेमणूकीनंतर ४ वर्षांच्या आत ही शैक्षणिक अर्हता प्राप्त करणे बंधनकारक असते.

– खेळाडूंची निवड ही ‘ट्रायल’ द्वारे होते. त्यासाठी रेल्वेच्या वेगवेळग्या झोन्स मार्फत विभागीय पातळीवर ट्रायल कमिट्या स्थापन केलेल्या असतात.

– ट्रायल कमिटीत खेळाचा अनुभव असलेले ४ ते ५ सदस्य असतात. ४ सदस्य हे रेल्वेचेच असतात तर गरज भासल्यास रेल्वे बाहेरच्या कब्बडीशी निगडित एका तज्ज्ञ व्यक्तीची नेमणूक केली जाते.

– ट्रायलच्या वेळी कमिटीतील प्रत्येक सदस्य खेळाडूला ‘फिट’ किंवा ‘नॉट फिट’ असा शेरा देतो. त्यासाठी सदस्य खेळाडूला त्याच्या खेळातील कौशल्य, शारीरिक तंदुरुस्ती आणि ट्रायल वेळी परीक्षकांची निरीक्षणे यावर आधारित ४० पैकी गुण देतो. ४० पैकी २५ व त्यापेक्षा जास्त गुण मिळवणारा खेळाडू हा ‘फिट’ घोषित केले जातो. नेमणुकीसाठी अर्थातच केवळ ‘फिट’ खेळाडूंचा विचार केला जातो.

– याशिवाय ट्रायल कमिटीतील सदस्य खेळाडूला १०० पैकी गुण देतात. या १०० गुणांचं विभाजन खालील प्रमाणे केले जाते.

अ.खेळाडूची आजवरची कामगिरी: ५० गुण

ब.खेळातील कौशल्य, शारीरिक तंदुरुस्ती आणि ट्रायल वेळी प्रशिक्षकांची निरीक्षणे: ४० गुण

क.शैक्षणिक पात्रता: ५ गुण

ड.सामान्य बुद्धिमत्ता,व्यक्तिमत्त्व चाचणी आणि मानसिक तयारी: ५ गुण

– नोकरीस पात्र होण्यासाठी किमान ६० गुण आवश्यक असतात.

– सगळ्या खेळाडूंना गुण दिल्यानंतर मेरिट लिस्ट म्हणजेच गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाते आणि त्यानुसार पात्र खेळाडूंची निवड नोकरीसाठी केली जाते. दोन खेळाडूंना सारखेच गुण असल्यास वयाने तरुण असलेल्या खेळाडूची निवड केली जाते.

२)खुल्या जाहिरतेद्वारे भरती:

– ज्या खेळाडूंना टॅलेंट स्काऊटिंगद्वारे संधी मिळत नाही त्यांना नोकरी मिळवण्याचा हा पर्याय उपलब्ध असतो.

– अशा भरतीसाठी रेल्वेकडून जाहिरात निघते.विविध वर्तमानपत्र आणि रेल्वे झोन्सच्या साईटवर ही जाहिरात प्रसिद्ध केली जाते आणि अर्ज मागवले जातात.

– भरतीसाठी असणाऱ्या सर्व अटी, पात्रता, वयोमर्यादा आणि ट्रायल्सची पद्धत ही साधारणपणे ‘टॅलेंट स्काऊटिंग’ पद्धतीप्रमाणेच असते.

रेल्वे संघात खेळलेले किंवा सध्या खेळणारे महाराष्ट्राचे काही प्रसिद्ध खेळाडू:

अभिलाषा म्हात्रे
सोनाली शिंगटे
श्रीकांत जाधव
नेहा घाडगे
विराज लांडगे
मीनल जाधव
रेखा सावंत
अपेक्षा टाकळे
रक्षा नारकर
आमिर धुमाळ