खांदा निखळला होता, पण तो मात्र खेळला आणि देशासाठी…

Despite shoulder injury he still went ahead and won Gold for the country

कतारमधील दोहा येथे २००६ च्या आशियाई स्पर्धा झाल्या तेव्हाची गोष्ट आहे. मुळात कबड्डी खेळणारे देश कमी त्यात श्रीलंका, थायलंड आणि नेपाळने स्पर्धेतून माघार घेतल्याने पाचच संघ उरले. पाच संघात स्पर्धा कशी खेळवणार? म्हणून मग राउंड रॉबिन पद्धतीने स्पर्धा खेळवली गेली.प्रत्येकी चार सामन्यांनंतर पहिले दोन संघ असतील त्यांच्यात अंतिम फेरीचा सामना आणि तिसऱ्या चौथ्या संघांत कांस्य पदकाचा सामना असे ठरले.

अंतिम सामन्याआधी भारत पाकिस्तानचा एक सामना झाला. या सामन्यांत भारताच्या राकेश कुमारला खांद्याला दुखापत झाली. त्यावेळी नक्की काय झाले होते याबद्दल राकेशने नुकतीच माहिती दिली.

तो म्हणाला,

“पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात माझ्या खांद्याला दुखापत झाली होती. डॉक्टरांकडे गेल्यावर त्यांनी माझ्या खांद्याची एकूण स्थिती पाहून मला पुढील सामन्यात न खेळण्याचा सल्ला दिला.”

डॉक्टरांचे बोलणे ऐकून आमचे प्रशिक्षक बलवान सिंग चक्रावले. ते म्हणाले,

“हा तर फिट आहे.ह्याला काय झालंय?”

मीही प्रशिक्षकांच्या सुरात सूर मिळवत म्हणालो,

“सर मी खेळतो. चिंता करू नका.”

मी एवढं बोलल्यावर प्रशिक्षक बलवान सिंगसुद्धा निर्धास्त झाले. माझ्यासाठी २००६ च्या आशियाई स्पर्धा पहिल्याच होत्या. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत मला अंतिम सामना खेळायचाच होता. पाकिस्तानविरुद्धच्या अंतिम सामन्यात मी खांद्याला बँडेज लावून उतरलो. आक्रमण आणि बचाव या दोन्ही आघाड्यांवर मी खेळलो आणि भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. भारताने पाकिस्तानचा ३५-२३ असा सहज पराभव करत पदक विजेतेपद मिळवले होते.ही माझी पहिलीच आशियाई स्पर्धा असल्याने अजूनही या आठवणी ताज्या आहेत.”

पुढे जाऊन राकेशने २०१० आणि २०१४ च्या आशियाई स्पर्धांमध्येही भारतासाठी सुवर्णपदक मिळवले.