पहिल्यांदा राखीव खेळाडू म्हणून खेळला आणि त्याने ठरवले… परत कधीच…

Played as a reserve player for the first time and he decided… Never Again…

तो खरंतर कबड्डी कधी खेळतच नसे.फक्त मित्राने आग्रह केला म्हणून त्याने कबड्डी खेळायला सुरुवात केली आणि एका वर्षात थेट आपल्या शाळेच्या संघात स्थान मिळवले. शाळेच्या संघाकडून खेळताना त्याला राष्ट्रीय स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली. या स्पर्धेत अशी एक घटना घडली की जिने त्याचे आयुष्य पालटून टाकले. तो खेळाडू होता राकेश कुमार जो पुढे जाऊन भारताचा कर्णधार बनला. ही घटना नेमकी काय होती हे त्याने नुकतेच सांगितले.

हरयाणा स्टीलर्सने आयोजित केलेल्या इन्स्टाग्राम लाईव्ह सेशनमध्ये बोलताना राकेश म्हणाला,

“मी १९९७ मध्ये शाळेच्या संघाकडून कबड्डी खेळत असे. त्यावेळी राष्ट्रीय स्पर्धेत खेळण्यासाठी निवड झालेल्या खेळाडूंना एक छानसे किट मिळत असे. ते किट मिळवण्याचा मी निश्चय केला. जेव्हा माझी शालेय राष्ट्रीत स्पर्धांसाठी निवड झाली तेव्हा मला खूप आनंद झाला होता.”

“माझ्या आठवणीप्रमाणे या स्पर्धेसाठी आम्ही बहुधा बारामतीला गेलो होतो.आमचे मुख्य प्रशिक्षक १७ वर्षाखालील संघाबरोबर गेले आणि आमच्या संघासोबत त्यांनी दुसऱ्या प्रशिक्षकांना पाठवले.त्यावेळी मी राईट कॉर्नर म्हणून खेळत असे. मुख्य प्रशिक्षकांनी आपल्या सहकाऱ्याला मला पहिल्या सात जणांमध्ये खेळविण्यास सांगितले होते. मात्र जेव्हा सामन्याची वेळ आली तेव्हा त्यांनी मला राखीव खेळाडू म्हणून ठेवले.अर्थातच मला खूप वाईट वाटले.मुख्य प्रशिक्षकांनी सांगूनही मला राखीव खेळाडू म्हणून ठेवण्यात आले. त्यावेळी पुन्हा एकदा माझा मित्र माझ्या मदतीला आला. त्याने माझी समजूत काढली.ही आपली पहिलीच स्पर्धा आहे त्यामुळे असं झालं असेल असे तो म्हणाला.”

“त्या स्पर्धेच्या वेळी मी ठरवलं की इथून पुढे असा खेळ करायचा की पुन्हा कधीच मला राखीव खेळाडू म्हणून बसवले जाणार नाही. तेव्हापासून ते अगदी माझ्या कारकिर्दीच्या शेवटपर्यंत मी दुखापतीची वेळ सोडली तर कायम पहिल्या सात खेळाडूंमध्ये खेळलो.”

पुढे जाऊन राकेशने भारताकडून दोन वेळा विश्वचषक जिंकला. आशियाई स्पर्धांचे सुवर्णपदकही मिळवले. प्रो कबड्डीच्या पहिल्या हंगामात राकेशला सगळ्यात मोठी बोली लागली होती. सध्या तो हरयाणा स्टीलर्सचा प्रशिक्षक म्हणून काम करतो आहे.