कधी काळी कबड्डी खेळायला घाबरत असे, पुढे जाऊन थेट भारताचा कर्णधार बनला
Once afraid to play Kabaddi, he later became the captain of India

लहान असताना त्याला क्रिकेटमध्ये जास्त रुची होती. मोठा भाऊ कबड्डी खेळत असे पण हा मात्र कबड्डी खेळायला घाबरत असे. मला कबड्डी खेळायला जमणार नाही असे त्याला वाटे. पुढे जाऊन हाच खेळाडू भारताचा कर्णधार बनला. आम्ही बोलतोय प्रसिद्ध कबड्डी खेळाडू आणि प्रशिक्षक राकेश कुमार ह्याच्याबद्दल. आपल्या कबड्डी प्रवासाबद्दल नुकतीच राकेशने माहिती दिली. तो हरयाणा स्टीलर्सने आयोजित इंस्टाग्राम लाईव्ह सेशनमध्ये बोलत होता.
यावेळी बोलताना राकेश म्हणाला,
Related Posts
“मी लहान असताना क्रिकेट खेळत असे. कबड्डीची मला फार आवड नव्हती. माझा मोठा भाऊ मात्र कबड्डी खेळत असे. एका मित्राने मला कबड्डी खेळण्याचा आग्रह केला. तेव्हाही मला कबड्डी खेळण्याची भीतीच वाटत होती. अखेरीस त्याने जबरदस्तीने कबड्डीच्या मैदानावर नेले. तिथे गेल्यावर मी काहीसा गोंधळून गेलो. ह्या सगळ्यांमध्ये आपण कसे कबड्डी खेळणार? असा प्रश्न मला पडला. पुन्हा माझ्या मित्राने माझी समजूत काढली आणि माझ्या कबड्डीला सुरुवात झाली.”
“जसा मी कबड्डी खेळत गेलो तशी माझी या खेळाची आवड वाढत गेली. कुठलाही मोठा खर्च न करता खेळता येणारा खेळ म्हणून कबड्डी मला आवडली. पुढे १९९७ मध्ये मी शाळेच्या संघाकडून खेळू लागलो. त्यावेळी राष्ट्रीय स्पर्धेत निवड झाली की एक छानसे किट मिळत असे. मलाही त्या किटची भुरळ पडली आणि मी त्यासाठी मेहनत करत राष्ट्रीय स्पर्धेत पोहोचलो. ते किट मिळाल्यावर मला प्रचंड आनंद झाला होता.”
पुढे जाऊन हाच राकेश दिल्लीसाठी वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत खेळला. आपल्या पहिल्याच वर्षात दिल्लीला तब्बल ३२ वर्षांनी राष्ट्रीय विजेतेपद मिळवून देण्यात त्याने महत्वाची भूमिका बजावली. त्यानंतर लवकरच २००३ मध्ये त्याला भारतीय संघात स्थान मिळाले. भारताकडून त्याने २००४ आणि २००७ चा विश्वचषक जिंकला. त्याने २००६ आणि २०१० च्या आशियाई स्पर्धांमध्ये भारताचे नेतृत्व करत भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. त्यानंतर पुढच्या वर्षी २०११ मध्ये कबड्डीमधील त्याच्या योगदानासाठी भारत सरकारने अर्जुन पुरस्कार देऊन त्याचा गौरव केला.