कर्णधारपदासाठी तयार नव्हतो – मनिंदर सिंग 

I wasn't yet ready for the captaincy exclaims Maninder Singh in a recent live chat

प्रो कबड्डीच्या सातव्या हंगामात बंगाल वॉरियर्सच्या कर्णधारपदाची जबाबदारी घेण्याची आपली तयारी नव्हती असे मनिंदर सिंगने सांगितले. एका वेबसाईटने आयोजित केलेल्या इंस्टाग्राम लाईव्ह सेशनमध्ये तो बोलत होता. मनिंदरच्या नेतृत्वाखाली बंगालने प्रो कबड्डीच्या सातव्या हंगामाचे विजेतेपद मिळवले होते.
प्रो कबड्डीच्या सातव्या हंगामात बंगालच्या संघ व्यवस्थापनाने कर्णधारपदाची जबाबदारी दिली तेव्हा काय वाटले? असा प्रश्न मनिंदरला विचारण्यात आला. त्याचे उत्तर देताना तो म्हणाला,
“मला जेव्हा त्यांनी सांगितले की तू संघाचा कर्णधार असणार आहेस तेव्हा मला थोडे विचित्र वाटले. त्यानंतर मी माझ्या भावाला फोन करून “मला कर्णधार व्हायचे नाही.” असे सांगितले. त्यावेळी भावाने मला समजावले आणि विश्वास दिला की, “तू हे करू शकतोस. तू स्वतःचा खेळ चांगला होईल याकडे लक्ष दे. बाकी सारे काही व्यवस्थित होईल.” त्यानतंर मात्र सगळे काही नीट पार पडले. कर्णधारपदाची जबाबदारी निभावताना मला मजा आली.”
“बंगालच्या पहिल्या सामन्यात मी सगळ्यांना सांगितले की कर्णधार म्हणून हा माझा पहिलाच सामना आहे. त्यामुळे सगळ्यांनी चांगले खेळून जिंकण्याचा प्रयत्न करा. युपी योद्धाबरोबरचा हा सामना आम्ही जिंकलो. तिथून मग एखादी गाडी जशी न थांबता चालत राहते तसे होत गेले आणि आम्ही विजेतेपद मिळवले.”
मनिंदरने कर्णधारपदाला साजेशी कामगिरी करताना २० सामन्यांत २०५ गुण नोंदवले. यात एका सुपर १० चा आणि सहा सुपर रेडचा समावेश होता.